मंगळवार, २० डिसेंबर, २०११

‘अन माझ्या मागे काही काहि नुरावे,
रंग-रूप अथवा नाव, गावही जावे
जाव्यात पुसोनी अस्तित्वाच्या रेषा....’
वाटते तुवां ही निरीच्छतेची हद्द
परि त्यातचि ये मज उत्कट इच्छा-गंध!..

-शेवटी फळाला आले तप सर्वांचे
शहरात मिळाले छोटे घर भाड्याचे
मंडई, पिठाची गिरणी, पाणी, शाळा-
आवश्यक ते ते समीप सगळे होते,
अन दरापुढती स्मशानसुद्धा होते...

येताना होते दोन्ही डोळे मिट्ले
अन जातानाही तसेच होते मिटले
क्षण एक उघडले आणिक पुन्हा मिटले...
क्षण एक उघडले, आणिक पुन्हा मिटले
ते-तेच तेव्हढे, जीवन आहे इथले!
हातात घेउनी विशाल पसरट थाळी
जेविते कधीची यमराजाची स्वारी
शिजलेली-कच्ची शिते आणखी तुकडे
ना भूक सरे, सरणारहि ना कधिकाळी
ही दुनिया आहे पांचालीची थाळी...

ही दुनिया म्हणजे आहे शाळा एक
विद्यार्थी आहे येणारा प्रत्येक
पंतोजी आहे पेंगत वरती बसला
अभ्यास करा, वा नका करू, ना शिक्षा
शाळेला येणे हीच येथली शिक्षा..

सोमवार, १९ डिसेंबर, २०११

विश्वाला अवघ्या संजीवनि वाहोनी
धावतात सरिता तीरावर घेवोनी
उद्ध्वस्त घाट अन जीर्ण मंदिरे, थडगी...
परि एखादीचे असते भाग्य विशाल
तीरावर असतो झळकत ताजमहाल!...

‘पेरणी करा परि आस नको कणसाची
तरु लावा परि कामना नको सुमनाची’
सांगशी जगाला कर्मयोग जगदिशा!
सांगशी जगाला कर्मयोग जगदिशा,
परि नको धरू रे, तूहि फळाची आशा!!